कोजागरी पौर्णिमा
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्व आहे. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण ‘कोजागिरी’ असा उच्चारतात आणि लिहितात.
आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण,पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या रात्री मंदिरे, घरे, उद्याने, रस्ते इ. ठिकाणी दिवे लावतात. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देवून स्वत: सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.दुस-या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणा करतात. अशी आख्यायिका सांगितली जाते की कोजागरीला उत्तररात्री लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.
ब्रह्मपुराणत या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणारांनी वरुण, हत्ती बाळगणारांनी विनायक व घोडे बाळगणारांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी. या रात्री ज्येष्ठ अपत्याला औक्षण करण्याची प्रथाही प्रचलित असल्याचे दिसते.
विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची उपासना केली जाते.
मसाला दूध नैवेद्य (पौर्णिमेचा चंद्र)
या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.
कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते. हा दिवस नवान्न पौर्णिमा म्हणून साजरा होतो.शेतातून हाती आलेले नवे धान्य वापरून दूध आणि साखर घालून त्याची खीर केली जाते.
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे.या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेले दिसते.घरासमोर लावलेल्या हरतर्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. (नवे(अनेकवचन नवी) म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.)
भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते.मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते.लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी हे परंपरा आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्यात आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची विशेष संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी विशेष दरही आकारला जातो.
कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते.
बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात.
मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते.
हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते.
राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात.
हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.