⚜️दुहीचे फळ⚜️

⚜️दुहीचे फळ⚜️

    एक शिका-याने पक्षयांना  पकडण्यासाठी एक जाळे पसरविले. त्यात दोन पक्षी अडकले. परंतु त्यांनी परस्पर विचार करून ताबडतोब त्या जाळ्यासकट उडण्यास सुरवात केली. शिका-याला ते पाहून दुःख झाले; तरीही तो जमिनीवरून पक्षयांकडे पाहत त्या दिशेने पळत सुटला. एका माणसाने बसल्या बसल्या हे दृश्य पहिले. त्याने शिका-याला जवळ बोलावून विचारले. "तू विनाकारण का पळत आहेस? पक्षी तर जाळे घेऊन आकाशात उडत आहे."
    शिकारी म्हणाला, " आता या पक्षामध्ये मित्रता आहे. परस्पर मेळ साधून ते एकाच दिशेने उडत आहेत. म्हणूनच ते माझे जाळे पळवू शकले; परंतु थोड्या वेळाने त्यांच्यात भांडण किंवा कुरबुर होऊ शकते. मी त्यांच्या मागे या अपेक्षेने धावत आहे.
जेव्हा एकमेकांशी भांडण केल्यामुळे जाळे व ते खाली पडतील त्यावेळेस मी त्यांना पकडीन".
        शिकारी म्हणाला, ते खरे ठरले थोड्या वेळाने ते पक्षी दमले. तेव्हा आपण कुठे उतरायचे यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाला. सामंजस्य नाहीसे झाल्यामुळे उडण्याची दिशा  व पंखांची गती सारखी राहिली नाही.
      त्यामुळे ते जाळे सांभाळू शकले नाहीत. जाळ्याच्या भाराने अडकत ते पण खाली पडावयास लागले व जाळ्यात अडकले. त्यांचे पंखदेखील गुरफटले गेले. परिणामतः जाळ्यासकट ते जमिनीवर पडले.  शिका-याने त्यांना सहज पकडले.

तात्पर्य :- एकीत बळ असते. दुहीने आपला नाश होतो.