⚜️सुंदर काय ?⚜️
एक सांबर नदीत
आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, ''अहाहा,
ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी
चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बरीक फारच वाईट आहेत! किती
रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते
तर किती बरे झाले असते!'' सांबर असा विचार करीत आहे तोच काही
शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी
मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली.
सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन
सांबराला ठार मारले! मरताने ते बोलले, ''अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या
शिंगांनी बरीक माझा जीव घेतला!''
तात्पर्य:- जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते, जे
उपयोगी पडते तेच खरोखर चांगले.