⚜️जीवनाचे सार⚜️

⚜️जीवनाचे सार⚜️ 

         एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त‍ पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हा‍ला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही  फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्या्त द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या  राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही..'' देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू , तुझ्या म्हणण्या प्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा  त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा  त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या् पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे् इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते  वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या  ओंब्यांमध्ये  एकही दाणा नव्हाताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय ओकलून रडू लागला. त्याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्मा  परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येईल पण तसे होत  नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वा-यातच पिक उभे राहते तेव्हाच  त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हाने मिळाले नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्ह्णून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्या‍साठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

 तात्पर्य:- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो.*