⚜️कर्माचा भागीदार..⚜️
एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली. घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज इथेच जेवण करा.
ब्राह्मण "हो" म्हणाला. ब्राम्हणाचे जेवण झाले. ब्राम्हणाने ताक मागीतले. नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते. ती म्हणाली,थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते. तिने शेजारणीकडे ताक मागीतले.शेजारणीने भांडेभरून ताक दिले. आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले.ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच. ब्राह्मण तडकाफडकी मेला.
चित्रगुप्त आणि यमाला प्रश्न पडला की.या कर्माचा भागीदार कोण? कारण ब्राम्हणाने आत्महत्या तर केली नव्हती. आजीनी अतिथी धर्म तर पाळला होता. शेजारणीने शेजारधर्म पाळला होता. कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते. यमाने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाश मार्गे चालली होती. माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडले. म्हणून ब्राह्मण मेला. यमाने घारीला जाब विचारला, घार म्हणाली यात माझा काय दोष? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता. मग आता या कर्माचा भागीदार कोण? ते पाप कोणाच्या माथी मारायचे? चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो. दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.
हा! हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, आजीच्या घरी ब्राह्मण जेवताना मेला. हळुहळु आळीतल्या बायका तिथे जमल्या. एक बाई ताईना म्हणाल्या, "काय हो आजी ब्राम्हण कसा काय मेला?तेंव्हा एक बाई म्हणाली, "आहो कसं सांगु तुम्हाला.या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते, ते द्रव्य हाडप करण्यासाठी आजीने भोजनात विष घालून ब्राम्हणाला ठार मारले.
चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर या बाईचे नाव लिहा. आणि तिथे जे जे कोणी या घटनेबद्दल चुकीचे बोलत होते त्यांना या कर्माचे भागिदार बनवले व जे जे बदनामी करतात त्यांच्या त्यांच्या माथी हे पाप मारले गेले.
तात्पर्य:- एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा फार मोठे पाप आहे. जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा स्वतःच्या कानानी ऐकून ती घटना सत्य असल्याची खात्री होत नाही, तो पर्यंत तुमच्या तोंडाने ती बोलू नका कारण खोटा प्रचार हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.