⚜️परतावा⚜️

⚜️परतावा⚜️

       एक स्त्री दररोज रोजच्या  स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते. एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज तिच्या दारात येऊन तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी  म्हणत असे.
   तुमच वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील,आणि तुम्ही केललं चांगलं  कर्म तुमच्याकडे परत येईल" तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतचं काय तरी म्हणतोय. तिने वैतागून ठरवलं... याला धडा शिकवलाच पाहिजे.तिने एके दिवशी चपातीत विष कालवले आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली त्याक्षणी तिला वाटले... 'हे मी काय करतेय?' असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तीने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली.
   नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला "तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहिल. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल".आणि तो चपाती घेऊन गेला.
   तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची. खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती.एक दिवस तो अचानक आला. दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं. कपडे फाटलेली होती. त्याला भूक लागली होती. आईला बघताच मुलगा म्हणाला "आई मी इथं पोहोचलो एका  लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे  बाबा आले , मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली. तो बाबा  म्हणाला "रोज मी हेच खातो, आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे".हे  ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला. तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर... तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता. 
   आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.'तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केललं चांगल कर्म तुमच्याकडे परत येतं'.

तात्पर्य:-  चांगल्या कर्माचा परतावा...नेहमी चांगलाच मिळतो.चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात. कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका.! आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास, ते काम सोडूच नका.!! जर आपला हेतुच शुध्द आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते.