⚜️साखर आणि माती⚜️

⚜️साखर आणि माती⚜️

     एक दिवस बादशहा अकबर यांच्या दरबार भरलेला होता, तेव्हा एक दरबारी हातात काचेची बरणी घेऊन आला.
   बादशहाने विचारले या बरणीत काय आहे'? दरबारी बोलला  'यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे'
     'ते कशासाठी?' अकबर बादशहाने पुन्हा विचारले.
    'माफी असावी, महाराज' दरबारी बोला. 'आम्ही बिरबलच्या बुध्दिमत्तेची परीक्षा घेऊ इच्छितो, आमची अशी इच्छा आहे की, त्यांनी मातीतून साखरेचा दाणानदाणा वेगळा करावा.'
     बादशहाने बिरबलकडे बघितले आणि स्मितहास्य करीत बोलले ' हे बघ, बिरबल तुझ्या समोर रोज नवीन आव्हान असतात, आम्हाला असे वाटते की तू पाणी न वापरता मातीतून साखर वेगळी करावी.'
      'हे तर खुपच सोपे आहे, महाराज. ' बिरबल बोलला 'हे तर लहान मुलांच्या खेळण्यासारखे आहे.'
      असे म्हणत बिरबलने बरणी उचलली आणि तो दरबाराच्या बाहेर निघाला आणि दरबारी देखील त्याच्या मागे गेले.
      बिरबल बागेत गेला आणि त्याने एका आंब्याच्या झाडाखाली बरणीतील साखर व मातीचे मिश्रण पसरवले.
      'हे तुम्ही काय केले?' एका दरबाऱ्याने विचारले. 'याचे उत्तर तुम्हाला उदया मिळेल' बिरबल बोलला.
      दुसऱ्या दिवशी ते सर्वजण बागेतील त्या आंब्याच्या झाडाजवळ पोचले, तिथे फक्त माती पडलेली होती. साखरेचे सर्व दाणे मुंग्या गोळा करून आपआपल्या वारूळात गेल्या होत्या, काही मुंग्या अजुनही साखरेचे दाणे घेऊन जाताना दिसत होत्या. 'परंतु सगळी साखर कुठे बरे गेली?' दरबाऱ्याने विचारले.
       'मातीपासुन वेगळी झाली' बिरबल बोलला.  सर्वजण हसायला लागले.
    बादशहाने सर्व दरबाऱ्यांना सांगीतले, 'जर तुम्हाला साखर पाहीजे असेल, तर मुंग्याच्या वारूळात जाऊन बघा'. सर्वजण जोरात हसायला लागले.
तात्पर्य:- बुध्दिमत्तेची कशीही परीक्षा घ्या, ते यशस्वी होईलच.