⚜️दहा रुपयांच्या बदल्यात १३ लाख....⚜️
शेठने नुकतंच दुकान उघडलं होतं. इतक्यात एक बाई आली आणि म्हणाली, "शेठजी, हे घ्या तुमचे दहा रुपये."
शेठ त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला, जणू विचारत होता, "मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले होते?"
बाई म्हणाली,"काल संध्याकाळी मी तुमच्याकडून ७० रुपयांचं सामान घेतलं. मी तुम्हाला १०० रुपये दिले होते. पण तुम्ही ३० रुपयांच्या ऐवजी ४० रुपये परत दिलेत. हेच दहा रुपये घेऊन आले आहे."
शेठने त्या दहा रुपयांच्या नोटेला कपाळाशी लावलं आणि गल्ल्यात ठेवत म्हणाला,"एक गोष्ट सांगा ताई, तुम्ही सामान घेताना पाच रुपये कमी व्हावेत म्हणून किती घासाघिस करत होता! पण आता हे दहा रुपये परत देण्यासाठी आलात?"
बाई सहजपणे म्हणाली,"घासाघिस करणं माझा हक्क आहे, पण एकदा भाव झाल्यावर कोणाचे पैसे खाणं पाप आहे."
शेठ थोडा गोंधळला आणि म्हणाला,"पण तुम्ही कमी पैसे दिलेच नव्हते. माझ्या चुकीमुळे तुमच्याकडे दहा रुपये जास्त गेले होते. तुम्ही ते पैसे ठेवले असते तरी मला काय फरक पडणार होता? असे दहा वीस रुपये किती वेळा जातात ओ!"
बाई शांतपणे म्हणाली,"तुम्हाला फरक नाही पडला तरी माझ्या मनावर ओझं राहील शेठ. मी जाणूनबुजून तुमचे पैसे खाल्ले असं वाटले असते. म्हणून मी रात्रीच पैसे परत द्यायला आले होते, पण दुकान बंद होतं."
शेठने विचारलं,"तुम्ही कुठे राहता?"
बाई म्हणाली,"मी स्टेशन जवळ राहते."
हे ऐकताच सेठ थक्क झाला. तो म्हणाला,"७ किलोमीटर दूरून फक्त हे दहा रुपये देण्यासाठी दोनदा आला आहात?"
बाई सहज म्हणाली,"हो. कारण मनशांती हवी असेल तर असं करावं लागतं. माझा नवरा आता जिवंत नाहीये पण त्यांनी एकच शिकवलं, दुसऱ्याच्या हक्काचा एक पैसाही खाऊ नका. कारण माणूस गप्प राहू शकतो, पण वरचा देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि त्या हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही मिळू शकते."
इतकं बोलून बाई गेली. बाई गेल्यावर शेठने लगेच गल्ल्यातून ३०० रुपये काढले आणि स्कूटीवर बसून दुसऱ्या दुकानात जातो. तो म्हणतो,"प्रकाशजी, हे तुमचे ३०० रुपये घ्या. काल सामान घेताना हिशोबात जास्त झाले होते."
प्रकाश हसत म्हणतो,"जास्त झाले होते तर पुढच्या वेळी मी आलो असतो तेव्हा दिले असते. एवढ्या सकाळी पैसे द्यायला आलात?"
शेठ म्हणतो,"पुढच्या वेळी तुम्ही आलात, तोपर्यंत मी मेलो असतो तर? तुम्हाला कधी कळलंच नसतं की माझ्याकडे तुमचे ३०० रुपये निघतात. म्हणून लगेच द्यायला हवे. देव कधी हिशोब मागेल सांगता येत नाही. त्या हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही मिळू शकते."
शेठ निघून गेला, पण प्रकाशच्या मनात खळबळ उडाली. कारण १० वर्षांपूर्वी त्याने एका मित्राकडून ३ लाख रुपये घेतले होते. पण पैसे दिल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मित्र मेला. त्याच्या कुटुंबाला पैशांबद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे प्रकाशने कधी परत दिले नाहीत. मनात लोभ आला आणि तो शांत राहिला.आता मात्र शेठचे शब्द - "देव कधी हिशोब मागेल सांगता येत नाही आणि त्याची शिक्षा मुलांनाही मिळू शकते"- हे त्याच्या अंतःकरणाला हादरवून गेले. दोन-तीन दिवस प्रकाश खूप तणावात होता. शेवटी त्याचा अंतरात्मा जागा झाला. त्याने बँकेतून १३ लाख रुपये काढले आणि मित्राच्या घरी गेला. मित्राची बायको घरातच होती. ती मुलांबरोबर बसली होती. प्रकाश तिच्या पायावर पडला आणि पैसे तिच्या हाती दिले.
जी बाई घरकाम करून, झाडू-पोछा करून मुलांना वाढवत होती, तिला हे १३ लाख खूप मोठं वरदान होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने प्रकाशला मनापासून आशीर्वाद दिले. आणि ही बाई दुसरी कोणी नव्हे, तर तीच होती जी शेठकडे दहा रुपये परत देण्यासाठी दोनदा आली होती.
तात्पर्य:- मेहनत आणि प्रामाणिकपणाने खाणाऱ्यांची देव परीक्षा घेतो, पण कधीही त्यांना एकटे सोडत नाही. देवाच्या घरात उशीर असतो पण अंधार कधीच नसतो.