⚜️सिंह व माणूस⚜️
एका जंगलात एके दिवशी एक शिकारी शिकार करण्यासाठी आला. त्याला पाहून जंगलातील
प्राणी घाबरून सैरावैरा पळू लागले. एका सिंहाने ते पाहिले, तो
पळणाऱ्या प्राण्यांना म्हणाला, "अरे माझ्यासारखा
शक्तिमान प्राणी तुमचा राजा असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण
नाही."सिंह असे बोलतो न बोलतो तोच सूं सूं करत एक बाण आला व सिंहाच्या पंजात
घुसला. सिंह तसाच विव्हळला. तीन पायावर पळत सुटला, एका
कोल्ह्याने पाहिले व म्हणाला, "वनराज आताच तर आपण
शौर्याच्या, शक्तीच्या गप्पा मारत होता, मग आता का घाबरून पळता आहात.' यावर सिंह कोल्ह्याला
म्हणाला, अरे बाबा, मी शक्तीने सर्व
प्राण्यांत श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुध्दीने सामर्थ्यशाली आहे त्याची
बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही.'
तात्पर्य :-
बुद्धिच्या सामर्थ्या पुढे शक्तीचे सामर्थ्य कमी पडते.