⚜️राज ज्योतिषी⚜️
अवंतीनगरीचे
राजा बाहुबली यांना राजज्योतिष्याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्यांनी ही इच्छा
व्यक्त केली. राजज्योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्यक्तिला निरखुन
पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले. या पदासाठी
पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्यात पिटवण्यात
आली. सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्वत:च मुलाखती
घेण्यास सुरुवात केली. अनेक ज्योतिष्यांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास
सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस तीन ज्योतिषी उरले त्यातील
पहिल्या ज्योतिष्याला राजाने विचारले,''तुम्ही भविष्य कसे सांगता'' ज्योतिषी
म्हणाला,''नक्षत्र पाहून'' राजाने
दुस-या ज्योतिष्याला हाच प्रश्न विचारला तेव्हा दुसरा ज्योतिषी म्हणाला,''हस्तरेषा पाहून
भविष्य सांगतो'' राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक
राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णुशर्माची आठवण झाली.
विष्णुशर्माला तात्काळ बोलावण्यात आले. राजाने विष्णुशर्माला विचारले,'' तुम्ही ज्योतिषी
असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्हाला राजज्योतिषी होणे आवडत नाही
काय''
विष्णुशर्माने
सांगितले,''महाराज मी घरी बसून माझ्या स्वत:च्या पत्रिकेचा अभ्यास
केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्ही मला
निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्याल हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळाले होते.
त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही.'' राजाला विष्णुशर्माची
अभ्यासू वृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हीचा अभिमान वाटून त्याने विष्णुशर्माला
राजज्योतिषी म्हणून नियुक्त केले.
तात्पर्य :- ज्यांचा स्वत:वर व स्वत:च्या अभ्यासावर
प्रचंड विश्वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्यांच्याकडे संधी आपोआप चालून
येते.