⚜️अशा मित्रापेक्षा, ते नसलेले बरे!⚜️
एक जंगल होते. गाय, घोडा, गाढव आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले. त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला, 'तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच मलाही तुमचा मित्र करून घ्या. ' , त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली व त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससाही त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता... अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वांना जाणीव झाली. ससा गाईला म्हणाला, 'तू मला तुझ्या पाठीवर बसव, जेव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव.' गाय म्हणाली, 'आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे.' तेव्हा ससा घोड्याकडे गेला आणि म्हणाला, 'तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव.' घोडा म्हणाला, 'मित्रा मी तुला पाठीवर घेतले असते, पण मला खाली बसताच येत नाही. मी तुला कसे पाठीवर घेऊ?' तेव्हा ससा गाढवाला म्हणाला, 'मित्रा, तू तरी मला मदत कर.' गाढव म्हणाले, 'मी तर आता घरी चाललो तू बघ.' मग शेवटी ससा बकरीकडे गेला व म्हणाला, 'बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?' बकरी म्हणाली, 'अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचवण्याच्या नादात ते मलाच फाडून खातील. तेव्हा तू तुझे बघ.' एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले. ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला, असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे !
तात्पर्य :- मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.