⚜️बौध्दिक विश्रांती⚜️
एका गावात एक ज्ञानी विद्वान पंडीत
होते. देशातील अनेक हुशार व व्यासंगी पंडीतांमध्ये त्यांच्या ज्ञानाची चर्चा
होत असे. शास्त्रार्थामध्ये हुशार असणारे हे पंडीत महाशय एके दिवशी आपल्या
घराजवळ राहणा-या लहान मुलांसमवेत खेळत होते. हे पाहून तेथून जाणा-या एका सदगृहस्थाने त्यांना थांबवून विचारले,’’ अहो देशात ज्यांच्या ज्ञानाची
चर्चा होते असे तुम्ही पंडीत असूनसुद्धा तुम्ही चक्क लहान काय खेळता आहात?’’
गृहस्थांचे
हे बोलणे ऐकून पंडीतजींनी आपला खेळ बंद केला व गृहस्थांना घेऊन ते जवळच्याच एका
घरात गेले. त्या घरात एका खुंटीला एक धनुष्य अडकविले होते. त्या धनुष्याकडे
बोट दाखवून पंडीतजी म्हणाले, "महोदय, त्या धनुष्याच्या प्रत्यंचेची
दोरी सध्या का सोडून ठेवली आहे, याचे
कारण तुम्हाला माहित आहे काय? कामाव्यतिरिक्तच्या
वेळेसही जर धनुष्याच्या कांबीची दोन्ही टोके जर वाकवून त्या दोरीला बांधून
ठेवली तर काही दिवसांनी ती कांबी मोडेल आणि धनुष्याची दोरी खेचायची बंद होईल.
परिणामी ते धनुष्य निकामी होईल. त्याचप्रमाणे अखंड लेखन, वाचन व चिंतन करत राहिल्याने
बुद्धीवरही प्रचंड ताण येऊन लवकरच बुद्धि थकून ती काम देईनाशी होते. ती तशी होऊ
नये म्हणून अधूनमधून मला लहान मुलांमध्ये माझे वय, हुद्दा, बुद्धी विसरून खेळावे लागते."
गृहस्थांचे या उत्तराने समाधान झाले.
तात्पर्य :- बुद्धीवर येणा-या
प्रचंड ताणापासून सुटका करून घेण्यासाठी थोडावेळ तरी आपल्या छंदाला किंवा
परिवाराला वेळ द्यावा ज्याने आपल्या मेंदूला थोडी विश्रांती मिळेल व पुन्हा
परिश्रम करण्यास मेंदू तयार होईल.