⚜️भाषाविवाद⚜️

    ⚜️भाषाविवाद⚜️

     कलकत्त्यात एकदा महिलांचे संमेलन भरले होते.  अध्यक्षस्थानी सरोजिनी नायडू होत्या. परस्पर परिचयानंतर भाषणाच्या व आपापले विचार मांडण्याचा कार्यक्रम होतो. वक्त्यांची भाषणे सुरु झाली. काही महिला उर्दूत, काही बंगालीत तर काही कन्नड भाषेत बोलत होत्या. गंमत म्हणजे प्रत्येक बोलणारी दुस-या भाषेवर टीका करीत होती.  आपलीच भाषा श्रेष्ठ असून, दुसरीत कसे दोष आहेत ते दाखवत होती. सरोजिनी नायडूंना त्या  गोष्टींचे आश्चर्ययुक्त दु:ख होत होते. इतक्यात कार्यक्रमाची एक कार्यकर्ती त्यांच्याकडे आली व म्हणाली, "बाई आपल्या  घरून फोन आला आहे. लहान मुलगा खूप रडत आहे.  कोणाकडूनच तो शांत होत नाही. तेव्हा आपल्याला लगेच घरी बोलावलं आहे." सरोजिनीबाई उभ्या राहिल्या. उपस्थित महिलांना त्यांनी घरचा निरोप सांगितला व म्हणाल्या, "घरी जाण्यापूर्वी मात्र मुलाला सांभाळणा-या बाईला फोनवरून विचारून घेते, की तो कोणत्या भाषेत रडत आहे ते सांग." तो टोमणा ऐकल्यानंतर उपस्थित सर्व महिला खजील झाल्या. भाषाप्रेमी, सर्व भाषांवर सारखेच प्रेम करणा-या महान विदुषी सरोजिनी नायडू हसत हसत घरी गेल्या .

तात्पर्य :- बहुभाषीय , बहुधर्मीय समाजात सर्व धर्मांप्रमाणेच सर्व भाषांचाही आपण आदर केला पाहिजे. आपल्या भाषेबरोबर दुस-या भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन समजूतदारपणाचा व सहानुभूतीचा असावा . भाषेने समाज जोडला गेला पाहिजे तोडला जाता कामा नये.