⚜️कलियुग⚜️
एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"
या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला, "कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो."
असे म्हणून तो आपल्या भात्यातून चार बाण घेतो आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडतो आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दितो.
सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने जातात.
जेव्हा अर्जुन बाण शोधून तो उचलतो तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकू येतो तो त्या आवाजाकडे वळतो व पाहतो एक कोकिळा खूप गोड आवाजात गात असते पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात असते, तो ससा खूप वेदना सहन करत असतो. या दैवी पक्ष्याचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसतो व तो ते ठिकाण पटकन सोडतो.
भीमा ज्या ठिकाणाहून बाण उचलतो त्या ठिकाणी पाच विहिरी असतात. एका विहरीभोवती चार विहीरी असतात. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने ते विहिरीबाहेर पडत असते. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असतांना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी असते. हे पाहून भीम चक्रावून जातो.
नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत असतो तेव्हा तो एक ठिकाणी पाहतो की एक गाय वासराला जन्म देत असते. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटत असते. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करतात. तेव्हा ते वासरू खूप जखमी झालेले असते. हे पाहून नकूल गोंधळून जातो.
सहदेवा एका डोंगराजवळून बाण उचलतो आणि पाहतो एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत असते. ती शिळा खाली येतांना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत येत असते पण ती शिळा एका लहान रोपामुळे थांबते. यावेळी सहदेव चकीत होतो.
हे चौघे या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारतात. श्रीकृष्ण हसतो आणि अर्थ सांगतो. "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."*
तात्पर्य:- जसे कर्म, तसे फळ. कितीही विरोध होऊ देत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या.