⚜️पोपटपंची विद्या...⚜️
एका गावात चार ब्राह्मणपुत्र होते. त्यांची मोठी मैत्री होती. एकदा त्यांनी विचार केला. या गावात राहण्यात काही फायदा नाही. आपण दुसऱ्या देशाला जाऊन काहीतरी विद्या मिळविली पाहिजे. काही पाठांतर केले पाहिजे. मग विद्येच्या बळावर आपल्याला मान सन्मान, पैसा मिळेल. असा विचार करून ते चौघे प्रवासाला निघाले. एका गावातील पाठशाळेत जाऊन त्यांनी विद्याभ्यास सुरू केला. अनेक मंत्र पाठ केले. अध्ययन संपल्यावर ते आपल्या गावाकडे निघाले. वाटेत त्यांना मेलेल्या प्राण्याचा सांगाडा दिसला.
तो पाहताच पहिला पंडित म्हणाला, "मी माझ्या जवळच्या मंत्र सामर्थ्याने या सांगाड्यात रक्त आणि मांस भरतो.' असे बोलून त्याने त्या सांगाड्यात रक्त- मांस भरले.
मग दुसरा पंडित म्हणाला, "रक्त मांस भरलेल्या सांगाड्यावर कातडी चढविण्याची विढ्या मला येते.' असे सांगून त्याने त्या सांगाड्यावर कातडे चढविले.
मग तिसरा पंडित म्हणाला, " मी अशा प्राण्यात इतर अवयव भरण्यास शिकलो आहे. असे बोलून त्याने त्या सांगाड्यात इतर सर्व अवयव भरले. त्याच क्षणी भयंकर अशा सिंहाचे शरीर उभे राहिले.
मग चौथा पंडित म्हणाला, "मला या निर्जीव प्राण्यात प्राण निर्माण करण्याची विद्या येते.' असे सांगून त्याने प्राणमंत्र म्हणताच, सिंह जिवंत झाला. त्याने एकाच फटक्यात त्या चौघा मूर्ख पंडितांना ठार मारले.
तात्पर्य : नुसते पोपटपंची ज्ञान घातक ठरते.